IND W vs SA W: पोरांनी वर्ल्ड कप जिंकला, इकडं पोरींची कमाल; चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय

India Women vs South Africa Women : भारतीय पोरांपाठोपाठ पोरींनीही कमाल केली आहे. चैन्नईमध्ये साऊथ आफ्रिकेला धुळ चारलीय. भारतीय क्रिकेट संघाने टी 20 वर्ल्ड कपवर नाव कोरलंय. तर भारतात पोरींनी चेन्नई टेस्टमध्ये दणदणीत विजय मिळवलाय. 

नेहा चौधरी | Updated: Jul 1, 2024, 07:17 PM IST
IND W vs SA W: पोरांनी वर्ल्ड कप जिंकला, इकडं पोरींची कमाल; चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय title=
India women win one off Test against South Africa by 10 wickets in chennai

IND W vs SA W : भारतीय टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपवर (T20 World Cup) नाव कोरल्यानंतर जल्लोष करत असताना दुसरीकडे भारतीय महिला क्रिकेट संघाने चाहत्यांचा आनंद द्विगुणीत केलाय. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केलाय. चेन्नईत झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय पोरींना कमाल केलीय. विशेष म्हणजे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी 10 गडी राखून पराभव केलाय. (India women win one off Test against South Africa by 10 wickets in chennai)

एमए चिदंबरम स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND w vs SA w) खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात, शफाली वर्माने पहिल्या डावात अप्रतिम फलंदाजी करुन चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. तिने 194 चेंडूत द्विशतक झळकावून टीम इंडिया मजबूत स्थितीत आणलं. ज्यामध्ये तिने 22 चौकार आणि 8 षटकार लगावले. तिने हे शतक 113 चेंडूत पूर्ण केलं. शेफालीने उपकर्णधार स्मृती मानधनासोबत पहिल्या विकेटसाठी 292 धावांची भागीदारी केली. 

एसने शुभासोबत दुसऱ्या विकेटसाठी 33 धावा जोडल्या, तर तिने जेमिमाह रॉड्रिग्जसोबत 86 धावांची भागीदारी केली. उजव्या हाताची फलंदाज शेफालीने 66 चेंडूत अर्धशतक तर 113 चेंडूत शतक पूर्ण केलं. शेफालीने 158 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या. भारताने पहिल्या डावात 6 गडी गमावून 606 धावा केल्या होत्या.

तर दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा वोलवॉर्ट आणि सेन लुस यांनी शानदार फलंदाजी केली. दोघांनी शतके केलं खरं पण ते वाया गेलं. लॉराने 122 धावांची तर सूनने 103 धावांची इनिंग खेळली होती. याशिवाय दुसऱ्या डावात कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेने 373 धावा केल्या आणि भारताला 37 धावांचं लक्ष्य दिलं होतं. 

भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात स्नेह राणाने 2, दीप्ती शर्माने 2, राजेश्वरी गायकवाडने 2, पूजा वस्त्राकारने 1 बळी आणि हरमनप्रीत कौरने 1 बळी घेतला. दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाने अखेरीस ही धावसंख्या गाठली. शुभा सतीश आणि शेफाली सलामीला आले आणि एकही विकेट न गमावता संघाला विजय मिळवून दिला. सतीशने 13 धावा केल्या तर शेफालीने 24 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने एका सामन्याची कसोटी मालिका सहज काबीज केली.